देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱया दहशतवादी कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देईल, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले. पंजाबच्या गुरूदारपूर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आम्ही कोणावर स्वत:हून हल्ला करीत नाही. परंतु, आमच्यावर कोणी हल्ला केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ, असे राजनाथ यावेळी म्हणाले. तसेच भारताला सौदार्हाचे संबंध हवे असूनही शेजारील देशाकडून असे भ्याड हल्ले का केले जात आहेत? हे मला समजलेले नाही. परंतु, मी त्यांना सांगू इच्छितो की, आम्हाला शांतता हवी असली तरी देशाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे राजनाथ यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, पंजाबमधील गुरुदासपूर पोलीस ठाण्यात लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांच्या जवानांशी गेल्या ११ तासांपासून सुरू असलेली चकमक सोमवारी संध्याकाळी संपुष्टात आली. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सहा जण मृत्युमुखी पडले. यामध्ये एका पोलीस अधीक्षकांसह तीन पोलीसांचा आणि तीन सामान्य नागरिकांचा समावेश आहे.