नव्या कायद्याचे राहुल गांधींचे आश्वासन

पंजाबमधील अमली पदार्थाच्या बेकायदेशीर व्यापाराला अकाली दलाचे सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप सोमवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस पक्ष अमली पदार्थाच्या विळख्यातून राज्याला मुक्त करील आणि अमली पदार्थाच्या तस्करांनी जो पैसा मिळविला आहे तो पीडितांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असेही गांधी म्हणाले.

अमली पदार्थाच्या विरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलन कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले. उडता पंजाब या चित्रपटावर बंदी घालण्याचा अकाली दलाचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमली पदार्थाच्या व्यापारातून लाभ होत असल्याचे मान्य करण्यास अकाली दल तयार नाही, असेही गांधी म्हणाले.

अमली पदार्थाच्या तस्करीतून ज्यांनी माया जमविली आणि इमले बांधले त्यांच्याकडून हा पैसा परत घेऊन तो पीडितांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल आणि अमली पदार्थविरोधी कायदा करण्यात येईल व पोलिसांना योग्य प्रकारे तैनात केले जाईल, असेही काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणाले.

निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर येईल आणि आम्ही अमली पदार्थाच्या विरोधात मोहीम हाती घेऊ, भट्टा परसौल येथे काँग्रेसने ज्या पद्धतीने आंदोलन पुकारले त्याचप्रमाणे लढा दिला जाईल, असेही ते म्हणाले.