सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या युद्धाविरोधात भारतीय लष्कराने स्वत:हून आक्रमक पवित्रा घेतला असून, आगामी सहा महिन्यांमध्ये त्याचे योग्य ते परिणाम दिसतील, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. संरक्षणमंत्र्यांप्रमाणे भारतीय लष्कराचे प्रमुख  दलबिर सिंह यांनीही भारतीय सैन्याने आक्रमक पवित्रा घेतल्याचे सांगितले. पाकिस्तान अजूनही सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कारवाया करत आहे.  अशाप्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या कमांडर्सना पूर्ण अधिकार देण्यात आले असल्याचे लष्करप्रमुख दलबिर सिंह यांनी म्हटले. अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजा मागे हटल्यानंतर सीमाभागात दहशतवादी हल्ल्यांची शक्यता वाढली आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीर भागात सुरक्षा व्यवस्था आणखी कडेकोट करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या काळात दहशतवादी वैफल्यग्रस्त होऊन हल्ले चढवित आहेत. २०१४मध्ये भारतीय सैन्याने ११० आणि २०१३मध्ये ५५ दहशतवाद्यांचे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले आहेत. त्यामुळे सीमेवर सैन्याचा लष्करी बंदोबस्त अभेद्य असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतीय सैन्याने स्वीकारलेल्या आक्रमक धोरणामुळेच घुसखोरीचे ६५ ते ७० टक्के प्रयत्न असफल झाले आहेत. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र, शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात येईल, असे पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले.