मागील काही दिवसांपासून समोर येत असलेली सकारात्मक बाब म्हणजे देशातील नव्या करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३८ हजार ३१० नवे करोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर, ४९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८२ लाख ६७ हजार ६२३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये ५८ हजार ३२३ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

देशातील एकूण ८२ लाख ६७ हजार ६२३ करोनाबाधितांमध्ये ५ लाख ४१हजार ४०५ अॅक्टिव्ह केसेस, करोनातून बरे झालेले ७६ लाख ३ हजार १२१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २३ हजार ९७ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

२ नोव्हेंबरपर्यंत देशात ११,१७, ८९, ३५० नमुन्यांची तपासणी झाली . यापैकी काल १० लाख ४६ हजार २४७ नमुने तपासण्यात आले.आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे का? याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे. मात्र राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी झालेली आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.