एका महिलेने लग्नाला होकार दिला नाही म्हणून तिला जिवंत जाळण्यात आले. राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. या महिलेने तिच्या प्रियकराचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून प्रियकराने आणि त्याच्या वडिलांनी तिला जाळले. सीमा यादव असे या महिलेचे नाव आहे. तिच्यावर सध्या उदयपूरच्या रूग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सीमाचा प्रियकर रवी यादव, त्याचे वडिल चंदू यादव आणि आई गंगा यादव या तिघांनाही अटक करण्यात आली.

या तिघांनी रस्त्यावर मारहाण केली. तसेच आपल्या अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले असा कबुली जबाब पीडित महिलेने दिला. ज्यानंतर कारवाई करण्यात आली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या तिघांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणात गुन्हाही नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या सीमाची प्रकृती चिंताजनक असून, ती जगेल की नाही हे देखील सांगता येत नाही असेही एएनआयने त्यांच्या बातमी म्हटले आहे.

रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. दोन महिलांवर गाझियाबाद आणि नोएडा या ठिकाणी बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर फक्त लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून महिलेला जाळण्यात आले. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशातील महिला सुरक्षित नाहीत हे अशा घटनांमधून वारंवार अधोरेखित होते आहे. दरम्यान, आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी सीमा यादवच्या कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.