पत्नीला पती सोबत राहण्याची इच्छा नसेल तर तसा निर्णय घेण्याचा अधिकार तिला स्वत:ला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीत म्हटले आहे. नेहमीपेक्षा वेगळया पठडीतल्या या प्रेम कथेत एका मुस्लिम तरुणाला हिंदू मुलीसोबत लग्न करायचे होते. यासाठी धर्मातंर करुन तो हिंदू बनला व त्या मुलीसोबत लग्न केले. फेब्रुवारी महिन्यात रायपूरमधल्या २३ वर्षीय हिंदू जैन तरुणीसोबत लग्न करण्यासाठी त्याने धर्मांतर केले. लग्नानंतर काही काळातच ती तरुणी तिच्या आई-वडिलांकडे रहायला निघून गेली. त्यानंतर त्या युवकाने १७ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तरुणीचे आई-वडिल आणि हिंदू संघटनांनी जबरदस्तीने पत्नीला आपल्यापासून विभक्त केल्याचा आरोप त्याने याचिकेत केला होता. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या खंडपीठाने धामतारीच्या पोलीस अधीक्षकांना तरुणीला २७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सुनावणीच्यावेळी त्या तरुणीने आपण स्वेच्छेने लग्न केले हे खरे आहे. पण आता आपल्याला आपल्या आई-वडिलांसोबत रहायचे असून आपल्यावर कोणताही दबाव नाही असे न्यायमूर्तींना सांगितले. तरुणीने लग्न केल्याचे मान्य केले आहे पण तिला आता नवऱ्यासोबत रहाण्याची इच्छा नाही असे खंडपीठाने याचिकाकर्त्याचे वकिल निखिल नय्यर यांना सांगितले. त्यावर नय्यर यांनी मुलगी आई-वडिलांच्या दबावाखाली आहे. ती मनापासून हे बोलत नाहीय असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने तरुणी प्रौढ असून ती तिच्या स्वत:च्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकते. तिला नवऱ्यासोबत रहायचे नसेल तर तो वैवाहिक तंटयाचा विषय आहे. त्यावर योग्य न्यायालयात सुनावणी होईल असा निकाल दिला.