बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षाच्या चाकामध्ये ओढणी अडकून एका ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कोलकात्याच्या बान्सद्रोनी भागातील ब्रह्मपूर क्रॉसिंगवर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. घटनेच्यावेळी महिलेचा पती आणि बहिण सोबत होती.

सबिता मिस्त्री असे मृत महिलेचे नाव आहे. ई-रिक्षा बऱ्यापैकी वेगामध्ये असताना या महिलेच्या गळयातील ओढणी चाकामध्ये अडकली. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या भावाचे निधन झाले होते. तिची बहिण तिच्याकडे रहायला आली होती. स्थानिक आश्रमात भावासाठी प्रार्थना करायला ते तिघे चालले असताना ही दुर्देवी घटना घडली असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

ओढणीची एकबाजू चाकामध्ये अडकल्यानंतर दुसऱ्या बाजूने ओढणीचा फास तिच्यागळयाभोवती आवळला गेला. ती महिला रिक्षातून खाली पडली व रिक्षा पूर्णपणे थांबेपर्यंत काही फूटापर्यंत फरफटत गेली. लगेचच या महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.