देशात महिलांवरील बलात्काराच्या घटना सुरूच असून मध्य प्रदेशमध्ये चार नराधमांनी एका २६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार  केल्यानंतर तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या या दुर्दैवी महिलेचा दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
होशांगबाद जिल्ह्य़ातील सिमारिया गावात राहणारी महिला शेजारच्या दुमार गावात राहणाऱ्या आईला भेटण्यासाठी गेली होती. त्या वेळी तिच्या ओळखीतील आरोपी हमीद, इर्शाद खान, आशिक आणि रईस खान यांनी मालमत्तेच्या वादातून तिच्याशी भांडण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चारही नराधमांसह हमीदच्या पत्नीने पीडित महिलेला पेटवून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेला जवळच्याच बानखेडीतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी चारही नराधमांसह हमीदच्या पत्नीलाही अटक केली आहे. त्यांच्यावर बलात्कार, खून, दंगल आणि अपहरण आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.