विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची धावत्या गाडीमध्ये गळा आवळून हत्या केली. बंगळुरुत यशवंतपूरमधील बीके नगर येथे ही घटना घडली. ममता असे आरोपी महिलेचे नाव असून ती येलहंका जवळच्या वीरासागरा येथे राहते. दुसऱ्या आरोपीचे नाव अप्पू (२४) आहे. ममताने अप्पूच्या मदतीने पती सागाई राजची (३०) हत्या केली. ममता आणि अप्पूने सागाई राजला दारु पाजल्यानंतर त्याची धावत्या गाडीमध्ये गळा आवळून हत्या केली.

ममता आणि सागाई राजचे पाचवर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना अपत्य नव्हते असे पोलिसांनी सांगितले. हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर ममताने पोलिसांना सांगितले कि, मंगळवारी रात्री आपला नवरा घराबाहेर पडला. पण तो कुठे चाललाय ते माहित नव्हते. रस्त्यावरच्या एका वाटसरुने त्याच्या हत्येची आपल्याला माहिती दिली. ममता लग्नाच्या आधी बीके नगरमध्ये रहायची. त्यावेळी तिचे अप्पू बरोबर सूत जमले. जो आधीपासून विवाहित होता. तिला अप्पू बरोबर लग्न करायचे होते. पण आई-वडिलांनी जबरदस्तीने तिचे लग्न सागाई राज बरोबर लावून दिले.

ममता या लग्नापासून खूश नव्हती. लग्नानंतरही तिचे अप्पू बरोबर संबंध होते. नवरा घरी नसताना अनेकदा ती अप्पूला घरी बोलवायची अशी माहिती पोलिसांनी दिली. सागाई राजला पत्नीच्या अनैतिक संबंधांबद्दल समजल्यानंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. त्यावेळी ममताने अप्पूच्या मदतीने नवऱ्याला मार्गातून हटवण्याचा कट रचला. सागाई राजला दारु पिण्याची सवय होती. मंगळवारी रात्री तो दारु पिऊन घरी आला.

त्यानंतर ममताने त्याला आणखी दारु पाजली व प्रियकराला घरी बोलावून घेतले. राजची शुद्ध हरपल्यानंतर दोघांनी त्याला गाडीत टाकले व त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्यांनी निर्जन स्थळी झुडुपामध्ये सागाई राजचा मृतदेह टाकून दिला. पोलिसांनी मोबाइल फोनचे रेकॉर्ड तपासल्यानंतर तिला अटक केली.