पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर वारंवार टीका केल्याने नेहमी चर्चेत असणारे भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आज जर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जिवंत असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. मात्र पुढे बोलताना त्यांनी आपण पक्ष सोडणार नसून, पक्षाने हवं असेल तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवावा असंही म्हटलं आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये दोन वेळा मंत्रीपद सांभाळणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काय शिकलंत असं विचारण्यात आलं. यावर त्यांनी नरेंद्र मोदींची ऊर्जा आपल्याला प्रेरणा देते असं सांगितलं. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘आपल्या ग्रंथांमध्ये रावणासहित सर्वांकडून शिकलं पाहिजे अशी शिकवण देण्यात आली आहे’.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपासोबत असणाऱ्या संबंधांविषयी यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी पक्षासोबत आपले संबंध थोडे कटू असल्याची कबुली दिली. शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी अटलबिहारी वाजपेयी सरकारचा उल्लेख केला.

अटलजींच्या कार्यकाळात आपण लोकशाही कार्यकाळाचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारशी तुलना करत सध्या हुकूमशाही असल्याचं म्हटलं. कोणतीही माहिती न देता नोटाबंदीसारखे निर्णय घेतले जातात. रात्री हे निर्णय जाहीर केले जातात असं ते बोलले आहेत.

सीबीआयवरुन सुरु असलेल्या गदारोळावरही शत्रुघ्न सिन्हा यांनी भाष्य करत आपण विरोधी पक्षांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं. सरकारने तपास यंत्रणेला संपवलं असल्याचं त्यांनी म्हटलं. ‘हे सीबीआय अधिकाऱ्यांमधील युद्ध नसून, राफेलसारखं काहीतरी झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असं ते बोलले आहेत.