केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामान्यांबरोबरच लोकप्रिय व्यक्तींचाही पाठिंबा मिळू लागला आहे. लोकप्रिय कुस्तीपटू बजरंग पूनियासुद्धा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा पाठिंबा देत असून सरकारच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहे. ट्विटवरुन पूनियाने या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. शेतकरी हे देशाच्या पाठीचा कणा आहे असं पूनियाने म्हटलं आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करु नका. देशाच्या अन्नदात्यांना त्यांच्या मागण्या मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. शक्तीचा वापर करुन कोणाचाही आवाज दाबता येणार नाही. आपल्या पुढील पिढ्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारने ऐकून घ्यावं असं पूनियाने म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Photos: अन्नदाता रस्त्यावर… थंडीमध्ये कुडकुडत आंदोलक शेतकऱ्यांनी घालवली रात्र

याचबरोबर इतर काही ट्विट पूनियाने केले आहेत. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये पूनियाने सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याला आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागत आहे. सर्वांनीच शेतकऱ्यांना पाठिंबा द्या. त्यांचा आवाज होण्याचा प्रयत्न करा. राजकारण नंतर करा, आधी तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात तुम्ही शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला आहे हे लक्षात असून त्याबद्दलचा आमचा स्वाभिमान अजून जिवंत आहे, असं पूनियाने म्हटलं आहे.

बजरंग पूनियाबरोबर कुस्तीपटू आणि भाजपाचा नेता योगेश्वर दत्त यानेही ट्विटवरुन आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे म्हटले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. केंद्र आणि राज्य सरकार सर्व योग्य मुद्द्यांवर उपाय नक्कीच शोधेल. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्वत: ट्विटवरुन केंद्र सरकार चर्चेसाठी कायम तयार आहे असं ट्विटवरुन म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी सर्व शेतकऱ्यांना महत्वाच्या मुद्द्यांवरुन थेट केंद्र सरकारशी चर्चा करावी असं आवाहनही केलं आहे. आंदोलन करणं हे योग्य माध्यम नसून चर्चा केल्यानेच या प्रश्नाचे समाधान सापडेल, असंही खट्टर म्हणाले आहेत. खट्टर यांचे हेच ट्विट योगेश्वर द्दतने रिट्विट केलं आहे.

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने यामुद्द्यावरुन जय जवान, जय किसान असं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर सर्व देश आहे. क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याचे वडील योगीराज सिंग यांनाही दिल्लीच्या सिमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावली होती.