सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मोदी सरकारला सुनावणाऱ्या लेखक चेतन भगत यांनी पुन्हा एकदा सरकारवर ट्विट हल्ला केला आहे. CAA (सुधारित नागरिकत्व कायदा) आणि NRC हे दोन्ही कायदे मु्स्लिमांवर अन्याय करणारे असल्याची टीका चेतन भगत यांनी केली आहे. विशेष म्हणजे चेतन भगत यांनी विमानातील प्रवाशी आणि लाईफ जॅकेटचं उदाहरण देऊन सरकारला आरसा दाखविण्याचाच प्रयत्न केला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. यात लेखक चेतन भगत यांनीही “गडगडणारी अर्थव्यवस्था. रोजगाराच्या कमी झालेल्या संधी. इंटरनेटवर बंदी. पोलिसांना वाचनालयामध्ये घुसवणे. तरुणांकडे संयम नक्कीच आहे. पण त्यांच्या संयमीची परीक्षा पाहू नका,” असं ट्विट करून चेतन भगत यांनी सरकारवर टीका काही दिवसांपूर्वी केली होती.

चेतन भगत यांनी  CAA (सुधारित नागरिकत्व कायदा) आणि NRC दोन्ही कायद्यांवरून पुन्हा मोदी सरकारला सुनावलं आहे. चेतन भगत यांनी सलग तीन ट्विट करून हे दोन्ही कायदे कसे मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे, हे सांगितलं आहे. “मुळात CAA ही समस्या नाही. पण CAA आणि NRC हे भेदभाव करणारे आहेत. त्यामुळे असं होऊ शकतं, असं म्हणत एक उदाहरण दिलं आहे.

NRC : सगळ्यांनी तुम्ही भारतीय असल्याचं सिद्ध करा.
मुस्लीम नसलेले : सर आमच्याकडं कागदपत्रे नाहीत.
Govt : काही हरकत नाही. CAA तुम्हाला वाचवेल. तुम्ही भारतीय आहात.
Muslim : सर माझ्याकडे कागदपत्रे नाहीत.
Govt : खुपच वाईट आहे. तुम्ही भारतीय नाही आहात. चालते व्हा.
असं उदाहरण देऊन चेतन भगत यांनी हे दोन्ही कायदे कसे मुस्लिमांवर अन्याय करणारे आहेत, असं सांगितलं आहे.

याचबरोबर दुसऱ्या ट्विटमध्ये चेतन भगत यांनी विमानातील प्रवाशी आणि लाईफ जॅकेटचं उदाहरण देऊन हे कायदे चुकीचे असल्याचं सरकारला सुनावलं आहे. “CAA हे लाईफ जॅकेट आहे. तर भारतीय असल्याचं सिद्ध केल्यानंतर NRC हे सगळ्यांना विमानातून बाहेर ढकलणार आहे. पण, मुस्लिमांना लाईफ जॅकेट मिळालेलंच नाही. लाईफ जॅकेट वाटण्यात आले हा मुद्दा नाही. तर मोजक्याच लोकांना लाईफ जॅकेट देण्यात आलं आणि सगळ्यांना विमानातून ढकलण्यात आलं. हा मुद्दा आहे” असं म्हणत चेतन भगत यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.

यापूर्वीही “देशामधील तरुणाईला चिंता वाटेल अशा अनेक गोष्टी घडत आहेत. तरी तरुणाईचा संयम ठासाळलेला नाही. असं असलं तरी या संयमाची परिक्षा घेतली जाऊ नये,” अशी अपेक्षा ट्विट करून व्यक्त केली होती.