सध्या देशात करोनाचं थैमान वाढत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही मोदी म्हणाले होते. तसंच याबाबत अधिक माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन देतील असं त्यांनी सांगितलं होतं. यावरून लेखिका शोभा डे यांनी टीका केली आहे. याबाबत सुरूवातीच्या दोन मिनिटांत घोषणा करता आली नसती का? अशी टीका त्यांनी केली आहे.

‘ठीक आहे…अखेर हे पॅकेज…सुरुवातीच्या दोन मिनिटांत ही घोषणा करु शकत नव्हते का ?’ अशा आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर शोभा डे यांनी केलं आहे. “मी अजून सहन करु शकत नाही. मी माझा टीव्ही बंद केला. ही तर हद्द झाली,’ अशा आशयाचं ट्विट त्यांनी भाषणादरम्यान केलं होतं.

प्रकाश आंबेडकरांचीही टीका

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशासमोर द्यायची नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हे सर्व सोडून दिलं आहे. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. “जर पंतप्रधानांना काही ठोस सांगायचंच नसेल तर ते लाइव्ह येऊन गोंधळ निर्माण करतातच का?” असा सवालही त्यांनी केला आहे.
“पंतप्रधानांनी संघटीत मध्यमवर्गासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पण असंघटीत आणि स्थलांतरीत कामगारांच्या हाती निराशाच आली आहे. मध्यम वर्गाची बाजू घेण्याची आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दिसून आली. परंतु याची पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही करण्यात येत आहे,” असं आंबेडकर म्हणाले.