याकूब मेमन याने मुंबई बॉम्बस्फोटात सामील असलेल्यांना आरडीएक्स उपलब्ध करून दिले होते शिवाय विमानाची तिकिटेही दिली होती. मेमन बंधू १० मार्च १९९३ रोजी म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस अगोदर मुंबईतून पळाले होते. या प्रकरणाचा तपास मुंबईचे आताचे सह पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. दक्षिण मध्य मुंबईत एका स्थानिक बीटवरच्या पोलिसाला वरळीत एक बेवारस मारुती ८०० ही गाडी दिसली. तिची नोंदणी कागदपत्रे रुबिना मेमनच्या नावाने होती. त्यावरून पोलिसांनी मेमन बंधूंच्या माहीम येथील अल हुसैनी इमारतीचा माग काढला. तेथे तपास करताना मारिया यांना फ्रीजवर एका दुचाकीच्या किल्ल्या सापडल्या व नंतर कठा बाजार भागात स्फोटकांनी भरलेले एक वाहन तपासात सापडले. या प्रकरणी निकालानंतर याकूबची पत्नी रहीन हिने दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले होते की, आम्ही कराचीत नजरकैदेत होतो, तेथे आम्हाला राहणे आवडत नव्हते म्हणून आम्ही भारतात आलो. तिच्या मते याकूब मेमन १९ जुलै १९९४ मध्ये स्वत:हून भारतात आला, पण त्याला अटक केल्याचे दाखवण्यात आले. काहींच्या मते याकूब मेमन व गुप्तचर संस्था यांच्यातील समझोत्यानुसार याकूबला १९९४ मध्ये दुबईमार्गे पाकिस्तानातून भारतात आणले. याकूबला टाडा न्यायालयाने २००७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली ती नंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. याकूबने बॉम्बस्फोटासाठी टायगर मेमनच्या मालकीच्या आस्थापनेमार्फत पैसा पुरवला. याकूबला कसे पकडण्यात आले याबाबत एकवाक्यता नाही. पण त्याने केलेल्या दाव्यानुसार त्याला नेपाळमध्ये पकडून भारतात आणण्यात आले. काठमांडू विमानतळावर जुलै १९९४ मध्ये त्याला अनेक व्हिसा कागदपत्रांसह पकडण्यात आले. सीबीआयच्या मते त्याला नवी दिल्लीत अटक करण्यात आली. त्याला फाशीची शिक्षा झाली असून तो आता नागपूर तुरुंगात आहे.

घटनाक्रम
’६ डिसेंबर १९९२- बाबरी मशीद पाडली.
’१० मार्च १९९३- हल्ल्यात सामील याकूब कुटुंबाचे पाकिस्तानात पलायन.
’१२ मार्च १९९३ – मुंबई बॉम्बस्फोटात २५७ ठार ७०० जखमी, एकूण तेरा बॉम्बस्फोट.
’एप्रिल १९९४- याकूब मेमनला पत्नीसह दिल्लीत अटक.
’ऑगस्ट १९९४- याकूबची कोठडीत मुलाखत.
’जुलै १९९९- याकूबचे सर्वोच्च न्यायालयाला खटल्यातून सोडून देण्याचे आवाहन.
’सप्टेंबर २०१०- वडील वारल्याने तुरुंगातून काही काळ बाहेर.
’जुलै २००७- टाडा न्यायालयाचे न्या. प्रमोद कोदे यांनी फाशी सुनावली.
’जुलै २००९- कुटुंबाबरोबर राहण्याची परवानगी देण्याची याकूबची मुंबई उच्च न्यायालयात मागणी फेटाळली.
’२१ मार्च २०१३- याकूबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब.
’मे २०१४- राष्ट्रपती मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली.
’सप्टेंबर २०१४- सर्वोच्च न्यायालयाची याकूबच्या फाशीला स्थगिती.
’डिसेंबर २०१४- सीबीआय व महाराष्ट्र सरकारला नोटीस.
’१० एप्रिल २०१५- फाशीवर सर्वोच्च न्याालयाचे शिक्कामोर्तब, ’निकालाच्या फेरविचाराची याचिका फेटाळली.
’१५ जुलै २०१५- याकूबला ३० जुलैला फाशी देणार असल्याचे प्रसारमाध्यमांचे वृत्त.
’२१ जुलै २०१५- याकूबची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ३० जुलैला फाशीची शक्यता.