गेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं तयार केलेल्या कोरोनिल या औषधावरून वाद निर्माण झाले होते. आयुष मंत्रालयानं कोरोनिल या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर काही ठिकाणी बाबा रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज (बुधवार) बाबा रामदेव यांनी कोरोनिलवर स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, हे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जर रोगमुक्त भारत करणं हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार, असंही ते म्हणाले. दरम्यान, आयुष मंत्रालयाला संपूर्ण अहवालही सोपवल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“आपल्या शब्दांचा खेळामध्ये पडायला नको. शब्दांच्या खेळामध्ये आम्ही आयुर्वेदाला भरडू शकत नाही. आज आम्ही कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय हे औषध बाजारात आणत आहोत. लोकं आमच्या औषधाची वाट पाहत आहेत,” असं बाबा रामदेव यावेळी म्हणाले. तसंच सांगितलेल्या नियमांप्रमाणेच या औषधाची चाचणी केल्याचंही त्यांनी नमूद केलं. आयुष मंत्रालयानंही पतंजलीची प्रशंसा केल्याचंही बाबा रामदेव म्हणाले.

“कोरोनिलमध्ये गिलॉय, अश्वगंधा आणि तुळस यांचं योग्य प्रमाणातील मिश्रण आहे. कोरोनिल आणि श्वासारी यांची संयुक्त चाचणी करण्यात आली. आम्ही याची निरनिराळी चाचणी केली नाही. पतंजली लोकांचं जीवन वाचवण्याचं काम करतो त्यांचा जीव घेण्याचं काम करत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. या औषधाद्वारे ३ दिवसांच्या कालावधीत ६९ टक्के रुग्ण बरे झाले. तर ७ दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केला. जर रोगमुक्त भारत करणं हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माझ्या जातीवरून टीका
“या दरम्यान माझ्या जाती आणि धर्मावरुनही टीका करण्यात आली. काही जणांनी सोशल मीडियावर बाबा रामदेव यांना ७ दिवसांमध्ये तुरूंगवास होणार असल्याचंही म्हटलं. आमच्या संशोधनामुळे ड्रग माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना वाटतं केवळ कोट आणि टाय परिधान करणारेच संशोधन करू शकतात. हे भगवे कपडे घालणाऱ्यानं कसं संशोधन केलं. मी विचारतो त्यांनी काय याचा ठेका घेतला आहे का?” असंही बाबा रामदेव यावेळी म्हणाले. माझ्या विरोधात काही जणांनी अपप्रचार केला असंही त्यांनी नमूद केलं.