लवकरच तुम्हाला आयकर रिटर्न भरल्यानंतर सरकारकडून टॅक्स रिफंडसाठी 63 दिवस वाट पाहावी लागणार नाही. केवळ एका दिवसात तुम्हाला प्राप्तिकर मिळावा मिळेल. कारण प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी अवघ्या एक दिवसात करणाऱ्या एकात्मिक ‘ई-फायलिंग’ आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्याची प्रक्रिया केवळ एका दिवसात होईल.

जवळपास 4 हजार 241 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या एकात्मिक ‘ई-फायलिंग’ आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीची जबाबदारी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंफोसिसकडे देण्यात आली आहे. सध्या प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्यासाठी सध्या 63 दिवसांचा कालावधी लागतो. पण 21 महिन्यांनंतर हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर जर तुम्ही विवरणपत्र अचूक दाखल केले असेल तर एका दिवसात परतावा मिळेल. ही नवी सुविधा निर्माण करण्यासाठी 18 महिने लागणार आहेत, त्यानंतर आणखी तीन महिन्यांच्या चाचणीनंतर ते सुरू होईल.
नवी प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली. नव्या प्रक्रियेमुळे प्राप्तिकराचे संकलन वेगाने करणे शक्य होईल. विवरणपत्रातील चुकांची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि झटपट होईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, आतापर्यंत 23 कोटी विवरणपत्रे दाखल झाली असून 2 लाख 61 हजार 808 कोटींचे परतावे 30 सप्टेंबर 2018पर्यंत देण्यात आले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर 2018 दरम्यान पहिल्या सहा महिन्यांत 1 कोटी 83 लाख रुपयांचा कर परतावा केंद्रीकृत प्रोसेसिंगद्वारे थेट जमा झाला आहे.