भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारविरोधी विधेयकाचा संसदेतील मार्ग रोखल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर संसदेतील भ्रष्टाचार विरोधी विधेयकांचा मार्ग रोखून धरल्याचा आरोप केल्यानंतर मोदींनी त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी काँग्रेसवर हल्ला चढवताना मोदींनी काँग्रेसचे मंत्री सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणत असल्याचा आरोप केला. गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे मंत्री जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत होते. मात्र, आता काँग्रेस मंत्र्यांकडून जनसामान्यांच्या डोळ्यात पेपर-स्प्रे फवारून दिशाभूल केली जात आहे, असे मोदींनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.