राहुल गांधी यांच्या आजी- आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्यासाठी पाइपलाइन टाकली होती का?, असा प्रश्न विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिराकूड धरण, सरदार सरोवर धरण आणि भाकरा धरण हे कोणी बांधले होते ?, असा प्रतिप्रश्न त्यांनी मोदींना केला आहे. तुमच्या पक्षातील ‘आजी-आजोबां’नी इंग्रजांशी हातमिळवणी केली. पण मोदींना हे माहित नसावे, अशा शब्दात सिब्बल यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.

शुक्रवारी छत्तीसगडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरुन काँग्रेसवर टीका केली होती. इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाव’ असा नारा दिला. पण देशातील गरीब कमी झाले का?, तुमच्या आजी- आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्यासाठी पाइपलाइन टाकली होती का?, असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी शनिवारी ट्विटरवरुन मोदींना प्रत्युत्तर दिले.

‘मोदीजी राहुल गांधींना विचारतात की तुमच्या आजी- आजोबांनी पाइपलाइन टाकली का ?, मग मोदीजी तुम्ही तरुण असताना रेल्वे स्थानकातील फलाटांवर कुठून पिण्याचे पाणी यायचे. नेहरु यांनी आधुनिक औद्योगिक भारताची पायाभरणी केली. पण तुमच्या पक्षातील आजी- आजोबांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती’, असे ट्विट त्यांनी केले.

कपिल सिब्बल यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेलाही प्रतिक्रिया दिली. मोदी बोलताना विचार करत नाही असे वाटते. हिराकूड, सरदार सरोवर, टिहरी, भाकरा ही धरणं कोणी बांधली ?, मोदींच्या किंवा त्यांच्या पक्षातील आजी- आजोबांनी ही धरणं बांधली का?, मोदींना भारताच्या इतिहासाची माहिती आहे का ?, असा प्रश्न त्यांनी विचारला.

मोदींच्या पक्षातील आजी- आजोबांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. १९४२ च्या भारत छोडो चळवळीत त्यांनी इंग्रजांची साथ दिली होती. हे तुमच्या आजी- आजोबांचे त्यावेळचे वागणे होते. दुर्दैवाने मोदींना त्यांच्या किंवा त्यांच्या पक्षातील आजी- आजोबांविषयी माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.