आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीला कंटाळून लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे मातोंडकर आता काँग्रेसमध्ये नसल्या तरी युवक काँग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. सत्यजीत तांबे म्हणाले, काँग्रेसचे युवा नेतृत्व असलेल्या उर्मिला मातोंडकर या विचारधारेशी एकनिष्ठ असेलल्या व्यक्ती आहेत. थोड्या काळासाठीच आम्ही त्यांच्यासोबत काम केले मात्र, या काळात त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्या विचारातील स्पष्टता आम्हाला जाणवत होती. तसेच त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. यातून त्यांची वैचारिक एकनिष्ठता प्रतित होते. राजकीय व्यक्ती नसल्याने त्यांना पक्षातील गटबाजी सहन झाली नाही आणि त्यांनी राजीनामा दिला, असे सांगताना तांबे यांनी देखील काँग्रेसमधील गटबाजीवर बोट ठेवले आहे. Maharashtra Congress President Balasaheb Thorat Ji visited Indian Youth Congress Office New Delhi today. IYC President Srinivas ji, GS Pratibha ji welcomed him. Youth Congress has demanded 60 tickets in upcoming Maharashtra Assembly Elections. pic.twitter.com/1Quz4ndjrE — Satyajeet Tambe (@satyajeettambe) September 11, 2019 दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी युवक काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडे ६० जागांची मागणी केल्याचे तांबे यांनी सांगितले आहे. आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महत्वाची पदं भुषवलेले सक्षम नेते आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी संधी देण्याची मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही महत्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले, स्थानिक स्तरावरील सर्व निवडणूका आम्ही एकमेकांविरोधात लढायचं आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकीत एकत्र यायचं हे पटत नाही. यावरुन स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही आघाडीबाबत नाराजी असल्याचे चित्र आहे.