आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी येताच जगमोहन रेड्डी यांनी आपला शब्द पाळला असून आरोग्य विभागात कार्यरत आशा सेविकांच्या पगारात तीनपटीने वाढ केली आहे. यामुळे आशा सेविकांच्या पगारात तब्बल सात हजारांची वाढ झाली असून पगार तीन हजाराहून १० हजारांवर पोहोचला आहे. मेडिकल आणि आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान जगमोहन रेड्डी यांनी हा निर्णय घेतला. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान जगमोहन रेड्डी यांनी आपण सत्तेत आल्यास आशा सेविकांचं मानधन वाढवू असं आश्वासन दिलं होतं. यानुसार जगमोहन रेड्डी यांनी आपण दिलेल्या शब्दाला जागत आशा सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. या बैठकीदरम्यान जगमोहन रेड्डी यांनी १०८ आणि १०४ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा पुर्ववत करण्याचा तसंच रुग्णवाहिका पुर्णपणे कार्यरत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यावेळी जगमोहन रेड्डी यांनी 'आरोग्यश्री' आरोग्य योजनेचं नाव बदलून 'वायएसआर आरोग्यश्री' ठेवलं. 'हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून मी स्वत: या विभागाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे', अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. जगमोहन रेड्डी यांनी यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णवाहिकांचा कामगिरी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला असून सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती खासगी रुग्णालयांपेक्षाही उत्तम असली पाहिजे यावर भर दिला. ३० मे रोजी जगमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जगमोहन रेड्डी यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या. तेलुगू देस्सम पक्षाला फक्त २३ जागांवर विजय मिळवता आला.