Arpita Mukherjee News in Marathi: पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याला बुधवारी नवं वळण मिळालं जेव्हा सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटींच्या रोख रक्कमेसहीत २९ कोटींची संपत्ती ताब्यात घेतली. बेलघराई येथील घरावर मारलेल्या छाप्यामध्ये ही संपत्ती ईडीच्या हाती लागली आहे. रात्री छापा टाकण्यात आल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत नोटांची मोजणी सुरु होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम किती आहे याचा पंचनामा करण्यासाठी चार नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवल्या. कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून या मशिन्स मागवण्यात आल्या होत्या. या छापेमारीनंतर भाजपेच्या दिलिप घोष यांनी हे प्रकरण जुनं असलं तरी ज्या पद्धतीने तपासाला वेग आला आहे ते पाहता यामधून कोणीही वाचू शकणार नाही असं म्हटलंय. “पार्थ चॅटर्जी यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीचा तपास मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. पार्थ हे सहजासहजी बोलणार नाहीत. पण अर्पिता यांनी माहिती देण्यास सुरुवात केलीय आणि आम्ही हे सारं ऐकतोय,” असं घोष यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> विश्लेषण : २० कोटींची रोख रक्कम ज्यांच्या घरात सापडली त्या अर्पिता मुखर्जी आहेत तरी कोण?

याच प्रकरणासंदर्भातील १० महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात…

१) ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटकेत असणाऱ्या अर्पिका मुखर्जींच्या चौकशीच्या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे बेलघराई येथील घरावर छापा टाकला. बुधवारी रात्री बेलघराई येथील दोन फ्लॅटवर छापा मारण्यात आला. यापैकी एका फ्लॅटमध्ये पैसे आणि सोनं आढळून आलं.

२) रात्री छापा टाकण्यात आल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत नोटांची मोजणी सुरु होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम किती आहे याचा पंचनामा करण्यासाठी चार नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवल्या. कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून या मशिन्स मागवण्यात आल्या होत्या.

३) बेलघराईमधील फ्लॅटमध्ये सापडलेली रोकड ही २० कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाच या इमारतीच्या नोटीस बोर्डवर मेन्टेन्स न भरलेल्यांच्या यादीमध्ये अर्पिता मुखर्जी यांचं नाव असून त्यांच्या या फ्लॅटचा ११ हजार ८१९ रुपये मेन्टेन्सची थकबाकी असल्याचं नोटीस बोर्डवर दिसत आहे.

४) प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार अर्पिता मुखर्जी यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये, “पार्थ चॅटर्जी माझ्या घराचा वापर मिनी बँक प्रमाणे करत होते” असं म्हटलंय.

५) अटकेत असणारे मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी राजीनाम्यासंदर्भातील मागणीवर प्रतिप्रश्न करताना “राजीनामा देण्याचं कारण काय?” असं विचारलंय.

६) ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पिता मुखर्जी या तपासामध्ये सहकार्य करत आहेत. मात्र त्याचवेळी पार्थ चॅटर्जी हे अनेक प्रश्नांना उत्तरं देण्यात टाळाटाळ करतना दिसत आहेत.

७) तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते कुणाल घोष यांनी अर्पित यांच्या घरामध्ये सापडलेली रक्कम आणि संपूर्ण घटनाक्रम हा पक्षाच्या नावाला गालबोट लावणारा असल्याचं म्हटलंय. “ते राजीनामा का देऊ असं विचारत आहेत. त्याऐवजी ते लोकांसमोर येऊन आपण निर्दोष असल्याचं का सांगत नाहीत? हे करण्यापासून त्यांना कोण थांबवत आहे?” असा प्रश्न घोष यांनी विचारलाय.

नक्की वाचा >> २० कोटी रोख, सोन्याच्या विटा, दागिने अन्…; बंगालमध्ये त्याच महिलेच्या दुसऱ्या घरात ईडीला सापडलं २९ कोटींचं घबाड

८) तृणमूलचं मुखपत्र असणाऱ्या ‘जागो बांगला’ या वृत्तपत्रामध्ये पार्थ चॅटर्जी यांचा मंत्री किंवा पक्षाचे सचीव असा उल्लेख करणं बंद केलं आहे.

९) जागो बांगलामध्ये प्रकाशित झालेल्या तृणमूलच्या वक्तव्यामध्ये कुणाल घोष यांनी ईडीच्या या कारवाईचा संबंध राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणारे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी जोडला आहे. “आम्ही राजभवानामध्ये सुवेंद्र अधिकारी यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेले होतो त्यावेळी धनकड यांनी मी पार्थ चॅटर्जीला सोडणार नाही असं म्हटलं. माझ्या पत्नीला त्यांनी अपमानित केल्याचं धनकड म्हणाले. त्यावेळी आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की यासंदर्भात तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले,” असं घोष म्हणाले.

नक्की वाचा >> विश्लेषण : मंत्र्याला अटक, निकटवर्तीयाच्या घरातून २० कोटी जप्त, पश्चिम बंगालमध्ये नेमका कसा झाला शिक्षक भरती घोटाळा?

१०) या प्रकरणामध्ये जो दोषी आढळेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मांडली. मात्र प्रसारमाध्यमाकडून होणाऱ्या ‘मिडीया ट्रायर्स’ योग्य नसल्याचंही त्या म्हणाल्या. तपास यंत्रणांचा वापर राजकीय पक्षांना बदनाम करण्यासाठी केला जाऊ नये असंही ममता यांनी म्हटलंय.