तंजावर इथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास दुर्घटना घडली. ५० पेक्षा जास्त जण रथ ओढत असतांना रथाच्या कळसाचा स्पर्श उघड्या वीजवाहक तारांना झाल्याने बसलेल्या वीजेच्या झटक्यात २५ पेक्षा जास्त होरपळून निघाले. या दुर्घटनेत ७ जणांचा तात्काळ मृत्यु झाला, तर चार जण उपचारादरम्यान दगावले असून १५ जण जखमी झाले आहेत, जखमीपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान मोदी यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली असून पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मृतांच्या नातेवाईंकाना दोन लाख तर जखमींना ५० हजारांची मदत देऊ केली आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.