नागालँडमधील मोन जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली. आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकारामुळे नागालँडमध्ये खळबळ उडाली असून मुख्यमंत्री नैफियू रिओ यांनी तातडीने घडलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटेनवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत सरकार आणि गृहमंत्रालयावर निशाणा साधला आहे.

नागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप!

या घटनेवर राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. “हे हृदय पिळवटून टाकणारे आहे. भारत सरकारने खरे उत्तर दिले पाहिजे. आपल्याच भूमीत नागरिक किंवा सुरक्षा कर्मचारी सुरक्षित नसताना गृह मंत्रालय नेमके काय करत आहे?” असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी भारत सरकारला केला आहे.

नेमकं काय घडलं?

नागालँडच्या मोन जिल्ह्यातल्या तिरु या गावात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटिंग गावातून काही लोक एका पिकअप व्हॅनमधून घरी परतण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले. मात्र, ते घरी पोहोचलेच नाहीत. सकाळपर्यंत ते पोहोचले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. तेव्हा तिरू गावानजीक पिकअप व्हॅनमध्ये ११ जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेत काही जखमी देखील असल्याचं सांगितलं जात असून मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.