Kerala Boat Capsized : केरळात मोठी दुर्घटना घडली आहे. केरळातील मल्लपुरम जिल्ह्यातील तनूर गावात पर्यटकांची होडी उलटली आहे. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेवेळी होडीत ४० च्या आसपास पर्यटक होते. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांची संख्या १५ वर गेली आहे, अशी माहिती केरळाचे राज्यमंत्री वी. आब्दुराहमान यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. याची माहिती मिळतात अग्निशमन आणि स्वयंसेवी दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पण, अंधार असल्याने बचावकार्याला अडथळे निर्माण होत आहेत. होडीखाली अनेक लोक अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत केली आहे.