मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या भीषण आठवणी आजही ताज्या आहेत. या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांच्या शिक्षेवरुन भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) खडेबोल सुनावले आहेत. “राजकीय मुद्द्यांमुळे काही प्रकरणांमध्ये जेव्हा दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची वेळ येते तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अकार्यक्षम असते”, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांना अजुनही संरक्षण दिलं जात असून त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही, अशी नाराजीही जयशंकर यांनी बोलून दाखवली आहे.

‘घड्याळ चोर’, इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी नागरिकांची घोषणाबाजी, कोर्ट परिसरात धक्काबुक्की

मुंबईत आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कटीबद्ध असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय समाजाने दिला पाहिजे, असेही जयशंकर या बैठकीत म्हणाले आहेत. “२६/११ चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजावर झालेला हल्ला होता. हत्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी विशिष्ट देशांच्या नागरिकांची ओळख पटवली होती. दहशतवादाचा सामना करण्यासाठी बांधिल असलेल्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना हे जाहीर आव्हान होते. तेव्हापासून आम्ही या हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, हे काम अजुनही अपूर्णच आहे”, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारची २५४ कोटींची कमाई २६ दिवसात आणि ती ही रद्दी, भंगार विकून; इतकी जागा रिकामी झाली की…

दहशतवादी हल्ले करणाऱ्या ‘लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेच्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यास चीन आडकाठी करत आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा मुलगा हाफिज तलाह सईद याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत ठेवला होता. हा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी तांत्रिक कारण देत चीनने स्थगित केला आहे. त्यापूर्वी संयुक्त राष्ट्रात लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी शाहीद महमूद याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्तावही चीननं रोखला आहे.