करोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सरकारी माहितीच्या आधारे सीएनएन न्यूज १८ ने दिलेल्या आखडेवारीनुसार देशात लसीकरणामुळे आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू झालाय. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत. वैज्ञानिक भाषेमध्ये अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला अ‍ॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंगी इम्यूनायझेशन म्हणजेच एईएफआय असं म्हटलं जातं. लसीकरण मोहीम हाती घेणाऱ्या प्रत्येक देशामध्ये अशाप्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. भविष्यामध्ये लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा यासाठी ही आकडेवारी गोळा केली जाते. ही आकडेवारी १६ जानेवारी ते ७ जून दरम्यानची आहे.

आकडेवारी पाहिल्यास लसीकरणामुळे मृत्यू झालेल्याचं प्रमाणात फारच कमी आहे. देशामध्ये ७ जूनपर्यंत २३ कोटी ५० लाख जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये एईएफआयची एकूण २६ हजार २०० प्रकरणं समोर आली आहेत. म्हणजेच टक्केवारीत सांगायचं झालं तर केवळ ०.०१ टक्के लोकांना लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत. आणखीन सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर १४३ दिवसांच्या कालावधीमध्ये लस घेणाऱ्या प्रत्येक १० हजार जणांमागे केवळ एका व्यक्तीला लसींचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत. तर लस घेणाऱ्या प्रत्येक १० लाख लोकांमागे दोन जणांचा मृत्यू झालाय.

नक्की वाचा >> मृतांना देण्यात आली रेमडेसिविर इंजेक्शन?; उत्तर प्रदेशमधील रुग्णालयाने दिले कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

गंभीर परिणाम दिसणाऱ्यांची संख्या कमी

आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या दोन्ही लसींसाठी एईएफआय टक्केवारी ही केवळ ०.१ टक्के इतकी आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आकडेवारी पाहिल्यास एईएफआयच्या प्रकरणांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळेच लसीकरण करुन घेणं हे अधिक फायद्याचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. भारतामध्ये करोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. सध्या करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये लसीकरण हे एकमेव प्रभावशाली मार्ग उपलब्ध आहे.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

नक्की वाचा >> कहर… गप्पा मारता मारता नर्सने पाच मिनिटांमध्ये एकाच व्यक्तीला दिले करोना लसीचे दोन डोस


मृतांबद्दलची ही माहिती आली समोर

सरकारी आखडेवारीनुसार एईएफआयच्या २६ हजार २०० प्रकरणांपैकी दोन टक्के लोकांचा म्हणजेच ४८८ जणांचा मृत्यू झालाय. मरण पावणाऱ्यांमध्ये ३०१ पुरुष आणि १७८ महिलांचा समावेश आहे. यापैकी नऊ जण महिला आहेत की पुरुष हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मरण पावलेल्यांपैकी ४५७ जणांना कोविशिल्डचा डोस देण्यात आला होता. तर कोव्हॅक्सिनचा डोस घेणाऱ्या २० जणांचा मृत्यू झालाय. ११ जणांनी नक्की कोणती लस घेतली होती याची माहिती देण्यात आलेली नाही. देशामध्ये २१ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यापैकी कोव्हॅक्सिनची संख्या केवळ दीड कोटी इतकी आहे.