निमलष्करी दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा यापुढे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी यासंदर्भातील घोषणा केली. ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमीच्या दीक्षांत समारोहात बोलत होते. सध्याच्या घडीला सुरक्षा दलांमध्ये महिलांचे प्रमाण फक्त ५.०४ टक्के इतके असून भविष्यात हा आकडा एक तृतीयांश इतका झाला पाहिजे, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने स्वत:च्या कक्षा विस्तारण्याची गरज असून यापुढे त्यांनी सायबर क्राईमच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे सीआयएसएफ हे पहिले दल आहे. सीआयएसएफमधील जवांनाची संख्या सध्या १.४७ लाख असून ती भविष्यात दोन लाख करण्याचा सरकारचा इरादा आहे.