आज १४ फेब्रुवारी जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. मात्र याच दिवशी २०१९ साली जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले, “ज्या जवानांना आम्ही पुलवामा हल्ल्यात गमावले, त्या वीर जवानांचे आजच्या दिवशी स्मरण होत आहे. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला आम्ही कधीही विसरु शकत नाही. त्यांचे साहस आम्हाला एक मजबूत आणि विकसित भारत बनवण्याची प्रेरणा देत असते.”

राहुल गांधी यांनीही व्यक्त केली श्रद्धांजली

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. “पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे सर्वोच्च बलिदान भारताच्या कायम स्मरणात राहिल”. यासोबतच सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पुलवामा हल्ल्याची आठवण करुन श्रद्धांजली व्यक्त करत आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले. एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात ४० जवान शहीद झाले. तर इतर अनेक जवान जखमी झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.