कोलकाता : बिकानेर : गुवाहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे गुरुवारी सायंकाळी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यातील दोमोहानी नजिक रुळांवरून घसरून उलटल्याने झालेल्या अपघातात किमान पाच जण ठार, तर ४५ हून अधिक लोक जखमी झाले. जमिनीपासून वर आलेल्या रुळांच्या बाजूला अनेक डबे पडले असून, बचावकार्य करणारे स्वयंसेवक त्यांतून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दूरचित्रवाहिन्यांवरील दृश्यांमध्ये दिसत होते. अपघातात ५ प्रवासी ठार झाले असून आणखी ४५ हून अधिक जखमी झाले, असे जलपैगुडीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले. ईशान्य सीमा (नॉर्थ ईस्ट फ्रंटियर) रेल्वेच्या अलीपूरद्वार विभागात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती रेल्वेच्या प्रवक्त्याने गुवाहाटीत दिली. अपघातस्थळ अलीपूरद्वार जंक्शनपासून ९० किलोमीटरपेक्षा दूर असल्याचेही तो म्हणाला. मुख्यमंत्र्यांसोबतच्या करोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे अपघाताबद्दल चौकशी केली. रेल्वे मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.