पाकिस्तानातील तुरुंगांमध्ये तब्बल ५४६ भारतीय नागरिक कैद आहेत. त्यात जवळपास ५०० मच्छिमारांचा समावेश आहे. पाकिस्तान सरकारने ही माहिती दिली आहे. पाकिस्तानी तुरुंगांत कैद असलेल्या भारतीय नागरिकांची यादीच इस्लामाबादमधील भारताच्या उच्चायुक्तांना देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील २१ मे २००८ मध्ये झालेल्या राजनैतिक मदत करारानुसार, पाकिस्तान सरकारने तेथील तुरुंगांतील भारतीय कैद्यांची यादी भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांच्याकडे दिली आहे. पाकिस्तानी तुरुंगांतील ५४६ कैद्यांमध्ये ५२ सर्वसामान्य नागरिक आहेत. तर ४९४ मच्छिमार आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. या करारानुसार, दोन्ही देशांकडून एका वर्षात दोनदा म्हणजेच १ जानेवारी आणि १ जुलैला तुरुंगांतील कैद्यांची यादी देण्यात येते. भारत सरकारकडूनही पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे भारतातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी देण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. यावर्षी १ जानेवारीला पाकिस्तान सरकारनं भारताकडं कैद्यांची यादी दिली होती. त्यानुसार पाकिस्तानात ३५१ भारतीय कैदी होते. त्यात ५४ सर्वसामान्य नागरिक आणि २९७ मच्छिमार होते. यावर्षी ६ जानेवारीला २१९ भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली. तर १० जुलै रोजी ७७ मच्छिमार आणि एका भारतीय नागरिकाची सुटका करणार असल्याची माहितीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली.