रायपूर शहरातील दोन गोदामांवर छापे टाकून महसूल आणि अन्न विभागांच्या अधिकाऱ्यांनी ३० लाख रुपये किमतीचा ६३६ क्विंटल कांदा जप्त केला.
रायपूर शहराजवळील भानपुरी परिसरात मे. नागराज आणि मे. टिकमदास यांची दोन गोदामे असून त्यामध्ये कांद्याची साठवणूक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सोमवारी सायंकाळी या गोदामांवर छापे टाकले आणि ६३६ क्विंटल कांदा जप्त केला.
कांद्याची साठवणूक करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वैध दस्तऐवज या गोदामाच्या मालकांकडे नव्हता. कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे छापे टाकण्यात आले.
अधिकाऱ्यांनी विलासपूर आणि दुर्ग जिल्ह्य़ातही छापे टाकले. मात्र त्यांना तेथे काहीही आढळले नाही. मात्र व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.