बंगळुरु :कर्नाटकमध्ये आतापर्यंत पावसामुळे ७३ जण मृत्युमुखी पडले. तसेच ७५ मदत शिबिरांत सात हजार ३८६ पूरग्रस्तांनी आश्रय घेतला असल्याची माहिती कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोका यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले, की १ जून ते ७ ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरांमुळे २१ हजार ७२७ नागरिक बाधित झाले आहेत. १४ जिल्ह्यांतील १६१ गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. यात सुमारे ७३ जणांना आपला जीव गमवावा लागला. यापैकी वीज कोसळल्याने १५ जण, झाड कोसळल्याने पाच जण, घरे कोसळल्याने १९ जण, नद्यांच्या पुरात २४ जण, दरड कोसळून नऊ जण आणि विजेच्या धक्क्याने एक जण मृत्युमुखी पडला आहे. सुमारे आठ हजार १९७ जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात पावसामुळे ६६६ घरे पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. दोन हजार ९४९ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच १७ हजार ७५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एक लाख २९ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह सात हजार ९४२ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे पावसाने नुकसान झाले आहे. अकरा हजार ७६८ रस्त्यांचे, एक हजार १५२ पूल आणि मोऱ्यांचे, दोन हजार २४९ अंगणवाडी केंद्र, ९५ बंधाऱ्यांचे पावसाने नुकसान झाले आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना मदतकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.