दिल्लीमध्ये २१ वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात तरुणाला तब्बल २० वेळा चाकूने भोसकण्यात आलं. या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणावर हल्ला होत असताना लोक फक्त पाहत उभे राहिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. घटनेनंतप परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव मनिष असून तो सुंदर नगरी परिसरात वास्तव्यास होता. आरोपींचीही ओळख पटली असून आलम, बिलाल आणि फैझान अशी त्यांची नावं आहेत. तिघांविरोधातही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत हे जातीय प्रकरण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवत असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसंच लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत आरोपी पीडित तरुणाची कॉलर पकडून त्याच्यावर वार करत असल्याचं दिसत आहे. तरुण पाळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण आरोपी त्याला पकडतात. आरोपी तरुणाला रस्त्यावर फरफटत नेताना आणि सतत वार करताना दिसत आहेत. यावेळी दोन लोक रस्त्यावर उभे होते, पण त्यातील कोणीही मदतीसाठी पुढे सरसावलं नाही.

“आम्हाला स्थानिकांनी फोन करुन घटनेची माहिती दिली. आमचं पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तपासादरम्यान तीन आरोपींची ओळख पटली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे”.