टपाल बचत खाती, ‘पीपीएफ’, ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम’ आणि ‘किसान विकास पत्र’ यासाठी आता आधार कार्ड सक्तीचे असणार आहे. या सगळ्या योजना वापरणाऱ्यांना आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पीपीएफ आणि टपाल बचत खातेदारांना आणि किसान विकासपत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम धारकांना आधार क्रमांक देणे सक्तीचे आहे, असे ‘गॅझेट नोटीफिकेशन’ केंद्रीय अर्थमंत्रलायने जारी केले आहे. तसेच नव्याने खाती उघडायची असतील तर आधार कार्ड देणे आता सक्तीचे केले आहे.

सरकारने याआधी बँक खाती, मोबाईल फोन आणि इतर अनेक सुविधांसाठी आधार अनिवार्य केले. मागील महिन्यात सरकारी योजना आणि सबसिडीचा लाभ घेणाऱ्यांसाठीही आधार क्रमांक देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले होते. निनावी व्यवहार, काळा पैसा यावर अंकुश लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत आधार क्रमांक देणे बंधनकारक होते, मात्र आता ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवण्यात आली आहे.