गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल येथे सर्वसामान्यांशी संवाद साधत पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं. काँग्रेस आता संपली आहे अशी टीका यावेळी त्यांनी केली. यावेळी त्यांनी भाजपा सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची योजना आखत असल्याचा टोलाही लगावला. पंजाबमधील आप सरकार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, पगारासाठीही पैसे नसताना गुजरातमध्ये जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करत आहेत, असा आरोप काँग्रेसकडून कऱण्यात आला आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता केजरीवाल यांनी कोणत्या पत्रकाराने हा प्रश्न विचारला आहे? अशी विचारणा केली. त्यावर काँग्रेस नेत्याने हा आरोप केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर उत्तर देताना त्यांनी सांगितलं "काँग्रेस आता संपली आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न घेणं बंद करा. लोकांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांना काय वाटतं याची कोणाला चिंता नाही". “तुम्हाला लाज वाटते का?,” रिक्षाचालकाच्या घरी जेवायला जाताना अडवल्याने केजरीवाल संतापले, पोलिसांना म्हणाले “तुमचे नेते…” अरविंद केजरीवाल आम आदमी पक्ष भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी असल्याचं मानत आहेत. ते वारंवार लोकांना आपली मतं काँग्रेसवर वाया घालवू नका असं आवाहन करत आहेत. "काही लोकांना राज्यात भाजपाची सत्ता नको आहे आणि त्यांना काँग्रेसला मत देण्यासही आवडत नाही. आपल्याला ती मतं मिळवायची आहेत. राज्यात भाजपाला आपणच पर्याय आहोत," असं अरविंद केजरीवाल यांना पक्षाला सांगितलं आहे. यावेळी अरविंद केजरीवालांना, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून तुम्ही मेधा पाटकर यांना समोर आणणार असल्याचा भाजपाचा दावा असल्याचं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी म्हटलं "त्यांना सांगा केजरीवालांचा आरोप आहे की, भाजपा नरेंद्र मोदी यांच्यानंतर सोनिया गांधींना पंतप्रधान कऱण्याची योजना आखत आहे. याबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे? ".