Rahul Gandhi Meets Pm Narendra Modi : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या बरोबरच पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
भारत कधीही लष्करी कारवाई करू शकतो, या भितीने पाकिस्तानची चलबिचल वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यातच भारत सरकार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत बैठकांवर बैठका घेत आहे. भारताच्या हवाई दल प्रमुखांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारताच्या नौदल प्रमुखांनी देखील पंतप्रधानांची भेट घेत पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात चर्चा केल्याचं बोललं जात आहे.
असं असतानाच आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीत राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहे.
राहुल गांधी आणि मोदी यांच्यात काय चर्चा झाली?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आज राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे भारत-पाकिस्तान तणावाची परिस्थिती असताना ही भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, सीबीआय प्रमुख प्रवीण सूद यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे सीबीआयच्या प्रमुखपदी निवड करण्यासंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi leaves from Prime Minister's Office (PMO). pic.twitter.com/eLX4NnsChQ
— ANI (@ANI) May 5, 2025
प्रवीण सूद यांना एक वर्षांची मुदतवाढ मिळणार?
केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख प्रवीण सूद यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचं इंडियन एक्सप्रेसने वृत्तात म्हटलं आहे. प्रवीण सूद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील सीबीआय प्रमुख निवडण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.
सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या तीन सदस्यीय निवड समितीने काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांवर चर्चा केली. मात्र, सुचवण्यात आलेल्या उमेदवारांपैकी कोणत्याही एका नावावर एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळे या तीन सदस्यीय निवड समितीने प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्ष वाढवण्यास सहमती दर्शवल्याचं चर्चा आहे.