तालिबानी शासन आल्यापासून अफगाणिस्तानातील राजकीय तसेच सामाजिक स्थितीत मोठा बदल झाला आहे. येते मुलींच्या उच्च शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. भारताने अफगाणीस्तानमधील अनेक नागरिकांचे व्हिजा रद्द केले असून यामध्ये काही विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. असे असताना परदेशात शिक्षण घेणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांची मोठी वाताहत होत आहे. आमच्यासाठी शिक्षणाचे दार उघडा अशी साद अफगाणीस्तानमधील या विद्यार्थ्यांनी भारत देशाला घातली आहे.

हेही वाचा >>> Rakesh Jhunjhunwala Death: भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे निधन

अफगाणिस्तानमधील अनेक विद्यार्थी भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठांत उच्च शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या साधारण २५०० आहे. मात्र तालिबानने अफगाणीस्तानवर कब्जा केल्यापासून भारताने अफगाणी नागरिकांचे व्हिजा रद्द केले आहेत. यामध्ये काही विद्यार्थीदेखील आहेत. याच कारणामुळे अफगाणी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. मूळची अफगाणीस्तानची नागरिक असलेली शहर नूर मोहम्मदी या विद्यार्थिनीने अफगाणीस्तानच्या विद्यार्थ्यांच्या अडचणींबद्दल अधिक माहिती दिली आहे.

हेही वाचा >>> तैवानला अमेरिकेचा दृढ पाठिंबा; चीनच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भूमिका

चंडीगढच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये तिला प्रवेश मिळालेला आहे. २०२० साली करोना महामारीच्या काळात ऑनलाईन शिकवणी असल्यामुळे तिला अडचण आली नाही. मात्र सध्या ऑफलाईन शिकवणी सुरू झालेली आहे. जवळ व्हिजा नसल्यामुळे तिला भारतात पुढील शिक्षणासाठी येता येत नाहीये. “माझ्या धाकट्या बहिणीचे शिक्षण थांबलेले आहे. ती आठव्या वर्गात आहे. मला माझ्या एका भारतीय मित्रासोबत छोटा व्यवसाय उभारायचा होता. मात्र आता ते करणे शक्य नाही,” अशी खंत तिने बोलून दाखवली आहे.

हेही वाचा >>> सलमान रश्दींवरील प्राणघातक हल्ल्यानंतर आता जे. के. रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी

शिक्षण सुरू रहावे यासाठी तिने भारतातील शिक्षकांना विनंतीचे अनेक मेसेज केले आहेत. मात्र या मेसेजेसना उत्तरं मिळालेली नाहीत, अशी खंत शहर नूर मोहम्मदीने बोलून दाखवली. अशीच स्थिती ओनिब दादगर या विद्यार्थ्याचीदेखील आहे. तो जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स कोर्सचा टॉपर आणि जेएनयू विद्यापीठात MCA कोर्समध्ये सुवर्णपदक विजेता आहे. त्याला म्हैसूर विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. मात्र व्हिजा नसल्यामुळे तो पुढील शिक्षण घेऊ शकत नाहीये. तो भारताला त्याचे दुसरे घर समजतो. मात्र अद्याप त्याचादेखील व्हिजा मंजूर करण्यात आलेला नाही. दादगर, मोहम्मदी यांच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी भारताने आमच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करावेत अशी साद घातली आहे.

हेही वाचा >>> भारताने आक्षेप घेतलेल्या चिनी जहाजाला अखेर श्रीलंकेची परवानगी

दरम्यान, मागील वर्षापर्यंत अफगाणिस्तामधील २५०० विद्यार्थी भारतात वेगवेगळ्या विद्यापीठीत शिक्षण घेत होते. मात्र सध्या सर्व अफगाणी नागरिकांचे व्हिजा रद्द करण्यात आले आहेत. यातील फक्त २०० आपत्कालीन ई-व्हिजा सरकारने मंजूर केले आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी भारताने आमचे व्हिजा मंजूर करून आमच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करावेत, अशी विनंती केली आहे.