अन्नसुरक्षा विधेयकाच्या अध्यादेशाला कालपर्यंत विरोध करणारे मुलायमसिंह यादव यांनी आज (गुरूवार) पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षाचा केंद्रातील ‘संपुआ’ला बाहेरून पाठिंबा आहे. आजच्या कॅबिनेटच्या बैठकीआधी राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी समाजवादी पक्षाच्या खासदारांसह मुलायमसिंह व पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यामध्ये अन्नसुरक्षा विधेयकावर दिड तास चर्चा झाली.
पत्रकारांनी पंतप्रधानांच्या भेटीचे कारण विचारले असता, फक्त पंतप्रधानांसोबत चहा घेण्यासाठी आलो होतो असे मुलायमसिंह म्हणाले.
मागील आठवड्यामध्ये मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षाने अन्नसुरक्षा कायद्याच्या अध्यादेशावरून काँग्रेसवर प्रखर टीका केली होती.
काँग्रेस या अध्यादेशामार्फत मतांचे राजकारण करत आसल्याचा आरोप यादव यांनी केला होता.
मागील लोकसभेच्या निदडणुकांच्यावेळी काँग्रेसने ‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा’ केला होता. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुक तोंडावर आली असताना आता ‘अन्नसुरक्षा विधेयक अध्यादेश’ काढून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचा आरोप यादव यांनी केला होता.  
“अन्नसुरक्षा विधेयक अध्यादेश लोकसभा निवडणुक डोक्यात ठेऊन काढण्यात आला आहे. काँग्रेसचा अध्यादेशामागील उद्देश निश्चितच चांगला नाही. माझ्या पक्षाचे या सर्व हालचालींकडे लक्ष असून शेतकऱयांचे अहित होणार नाही याची काळजी घेतली जाईल. काँग्रेस फक्त मतांचे राजकारण करत आहे.”, असे वक्तव्य मुलायमसिंह यादव यांनी केले होते.
“प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये व देशाच्या इतर भागांत पाच लाखांवर नागरिक उपासमारीमुळे मृत्यूमुखी पडले. त्यावेळी केंद्र सरकारणे त्यांना अन्न-धान्य वाटप का केले नाही. काँग्रेसची संपूर्ण देशामध्ये दयनीय अवस्था असून, हा अध्यादेश केवळ प्रचार आहे.”,  असा आरोप मागील आठवड्यात यादव यांनी केला होता.