गंगा आणि यमुना नदीचे स्वच्छता अभियान पूर्ण झाल्यानंतर देशातील इतर नद्याही ‘मी टू’ म्हणतील, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे. नदी आणि महिलांना पुढे जाण्यात कोणताही अडथळा असू नये, असेही त्या म्हणाल्या. ‘मी टू’ हे आंदोलन महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित एक अभियान असून सध्या सोशल मीडियावर याची मोठी चर्चा आहे. देशातील विविध क्षेत्रातील उच्च पदावरील व्यक्तींची नावे यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जोपर्यंत जगातील सर्वांत मोठ्या जलाशयांपैकी एक असलेल्या या नदीची समस्या समजून घेतली जात नाही. तोपर्यंत तिच्या अडचणींचे निवारण होऊ शकत नाही, असे उमा भारती यांनी एका सरकारी अधिसूचनेचा उल्लेख करत म्हटले.

नद्या वाचवण्यासाठी देशातील ही एक महत्वाची मोहीम आहे. ही मोहीम गंगा आणि यमुना येथून सुरु होईल. नंतर देश आणि विदेशातील इतर नद्याही ‘मी टू’ म्हणतील आणि आंदोलन सुरु करतील.

नितीन गडकरी यांनी हे अभियान सुरु केले आणि सर्व नद्या ‘मी टू’ म्हणू लागल्या. नदी आणि महिलांना पुढे जाण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये. हाच संकल्प आज केला जात आहे, असे त्यांनी म्हटले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. विदेश राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर मी टू’ प्रकरणी होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता गडकरी यांनी काहीच उत्तर दिले नाही.