नोटाबंदीला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाला. यानिमित्त सत्ताधाऱ्यांनी काळा पैसा विरोधी दिन तर विरोधकांनी काळा दिवस म्हणून साजरा केला. परंतु, नव्याने उजेडात आलेल्या वृत्तानुसार नोटाबंदीच्या एक वर्षभरात देशातील विमानतळांवरून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ८७ कोटी रूपयांची रोकड व २६०० किलो सोने आणि चांदी पकडली आहे.

सीआयएसएफकडे देशातील ५९ विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने सीआयएसएफला रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या सामानावर लक्ष ठेवण्याची सूचना केली होती.

सीआयएसएफच्या आकडेवारीनुसार ८ नोव्हेंबर २०१६ ते ७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत ८१.१७ कोटी रूपयांची संशयित रोकड त्याचबरोबर १४९१.५ किलो सोने आणि ५७२.६३ किलो चांदी मिळून आली आहे.

सर्वाधिक ३३ कोटी रूपये मुंबईच्या विमातळावरून जप्त करण्यात आले. तर सर्वाधिक ४९८ किलो सोने हे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात आले. तर २६६ किलो चांदी हे जयपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.