पीटीआय, नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतरही त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान यांनी सरकारी निवासस्थान न सोडल्याने केंद्र सरकारने अखेर त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारी पथक पाठवले. सरकारी निवासस्थान रिकामे करण्यासाठी गेल्या वर्षी चिराग पासवान यांना नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र तरीही त्यांनी सरकारी निवासस्थान सोडले नव्हते. सरकारी कारवाईनंतर त्यांनी हे निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्र्यांना नवी दिल्लीत सरकारी निवासस्थान दिले जाते. मंत्रीपद सोडल्यानंतर या निवासस्थानाचा त्याग करावा लागतो. पदावर असताना मृत्यू झाल्यानंतर मंत्र्यांच्या कुटुंबीयांना निवासस्थान सोडावे लागते. मात्र रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतरही लोकसभा खासदार चिराग पासवान यांनी १२ जनपथ येथील सरकारी निवासस्थान न सोडल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र या नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने मालमत्ता संचालकांचे पथक पासवान यांच्या निवासस्थानी पाठवले. या कारवाईनंतर पासवान यांनी हे निवासस्थान सोडले.