महागाईच्या विळख्यात अडकलेल्या सामान्य जनतेला रेल्वे दरवाढीचा चटका लवकरच बसण्याची शक्यता आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे रेल्वेवर ३ हजार ३०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी रेल्वे दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. २६ फेब्रुवारी रोजी जाणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात  प्रवासभाडय़ावर इंधन अधिभार लावण्याची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.प्रवासभाडय़ाऐवजी मालवाहतुकीच्या दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनीही या दरवाढीच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे. याबाबत येत्या पंधरवडय़ात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.