Pahalgam Terror Attack Updates Today : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह २६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. देशभरातली विविध राज्यातून पर्यटक पहलगामला गेले होते. परंतु, त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, या भ्याड हल्ल्याला अनेकांनी अमानवी कृत्य संबोधलं आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांसमोर गोळ्या झाडल्या. या कृत्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. यावर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना अंदाधुंदपणे मारले. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. आम्हाला अपेक्षा आहे की सरकार कठोर कारवाई करेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे देखील गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे”, असे ओवैसी यांनी हैदराबादमध्ये पत्रकारांना सांगितले. तसंच, त्यांनी आशा व्यक्त केली की सरकार या सर्व दहशतवाद्यांना धडा शिकवेल आणि पीडितांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय देईल. ते पुढे म्हणाले, “त्यांचा पक्ष एआयएमआयएम, या घटनेतील बळींच्या कुटुंबियांसोबत उभा आहे आणि जखमींना बरं वाटावं म्हणून प्रार्थना करतो.”
शेजारील लोकांचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आहे
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला “नरसंहार” म्हणत हैदराबादचे खासदार म्हणाले की सरकारच्या प्रतिबंधात्मक धोरणाचे प्रभावीपणाचे मूल्यांकन केले पाहिजे. नरेंद्र मोदी सरकारने त्यांचे प्रतिबंधक धोरण किती प्रमाणात यशस्वी होत आहे की नाही हे पाहावे. शेजारच्या देशातून आलेल्या दहशतवाद्यांचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आणि निष्पाप लोकांना मारणे आहे, असेही ते म्हणाले.
पहलगाम आतंकी हमले कि हम कड़ी निंदा करते हैं, यह घटना उरी और पुलवामा हमलों से भी अधिक दर्दनाक घटना है। हम उम्मीद करते हैं की हुकूमत इन दहशतगर्दों को एक सबक सिखाएगी।pic.twitter.com/SvdAoRkaU0
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 23, 2025
दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी संशयित दहशतवाद्यांचे चित्र आणि छायाचित्र जाहीर केले आहेत. त्यांची ओळखही पटवण्यात आली आहे. फोटोत असलेल्या चौघांपैकी तीन दहशतवाद्यांची ओळख पटली असून आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत.
पहलगाम येथील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवादी गट लष्कर ए तैयबाची शाखा असलेल्या दि रेझिस्टन्स फ्रंटचे हे सदस्य असल्याचं म्हटलं जातंय. दरीच्या सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून कुर्ता पायजमा घातलेले किमान ५ ते ६ दहशतवादी बैरसन कुराणात आले. त्यांनी एके ४७ ने गोळीबार केला. गुप्तचर संस्थांनी या हत्याकांडाचा सूत्रधार सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिदचीही ओळख पटवली आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर होता. जंगलाचा फायदा घेऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.