भारतातील सर्व मुस्लीम शिल्पकार हे भगवान विश्वकर्मा यांचे वंशज आहेत, असा दावा भाजपा खासदाराने केला आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील रामपुरीमध्ये गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार रामचंद्र जांगडा यांनी हा दावा केला. ज्या ठिकाणी श्रमाला, पुरूषार्थाला सन्मान मिळत नाही, तिथून धर्माविषयी प्रतिक्रिया उमटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही हेच केलं, असं मत खासदार जांगडा यांनी मांडलं. मागास आयोगाचे सदस्य आणि खासदार रामचंद्र जांगडा यांच्या उपस्थितीत सन्मान रामपुरी येथील विश्वकर्मा मंदिरात गौरव सोहळा पार पडला. या गौरव सोहळ्यात बोलताना रामचंद्र जांगडा यांनी भारतातील मुस्लीम शिल्पकारांविषयी भाष्य केलं. "सर्व शिल्पकार भगवान विश्वकर्मांचे वंशज आहेत. फक्त हिंदूच नाही, तर उत्तर प्रदेश मुस्लीम शिल्पकारांनी भरलेला आहे. बाबर त्याच्यासोबत शिल्पकार घेऊन आला नव्हता. तिथे शिल्पकार असूच शकत नाही. इराक आणि इराणमध्ये तिथे गवतसुद्धा उगवत नाही, तिथे शिल्पकला कशी निर्माण होऊ शकते. खनिज तिथे मिळत नाही. तिथे फक्त तेल मिळतं आणि तेलामुळे शिल्पकला करता येत नाही", असं खासदार जांगडा म्हणाले. "इथे जे मुस्लीम बांधव आहेत, ते सर्वच्या सर्व भगवान विष्णूकर्माचे वंशज आहेत. कुठल्यातरी कारणामुळे त्यांना धर्मांतर करावं लागलं असेल. मी इतिहास वाचला आहे. ही कारणही मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. अनेक गोष्टी फक्त सांगण्यासाठी असतात. पण, एक गोष्ट निश्चित आहे की, जिथे श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. मेहनतीला सन्मान मिळत नाही, पुरूषार्थाला सन्मान मिळत नाही. तिथे व्यक्ती धर्मालाच दोष देतो. हे केवळ मुस्लीम शिल्पकारानीच केलं असं नाही, तर हे बाबासाहेब आंबडेकर यांनीही केलं. मी हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे त्यांना बोलावं लागलं. ते बॅरिस्टर होते. अर्थतज्ज्ञ होते. जो सन्मान त्यांना समाजाकडून मिळायला हवा होता, तो त्यांना मिळाला नाही. हेच मुस्लीम शिल्पकरांसोबत झालं असेल. सन्मान मिळाला नाही म्हणून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली", असं जांगडा यांनी म्हटलं आहे. #WATCH Every craftsman is descendant of Lord Vishwakarma. Babur didn't come to India with sculptors. There're only sand dunes in Iraq, Iran & UAE so this craft can't exist there. Hence, all Muslim sculptors are descendants of Lord Vishwakarma: BJP RS MP Ram Chander Jangra (01.08) pic.twitter.com/CjjUHHYgJY — ANI UP (@ANINewsUP) August 1, 2021 यावेळी बोलताना त्यांनी विश्वकर्मा समुदायाला एकत्र येऊन राजकीय शक्ती वाढवण्याचंही आवाहन केलं. कामगार आणि श्रमाच्या सन्मानातूनच भारत आत्मनिर्भर बनेल. त्यामुळे विश्वकर्मा समाजाने एकजूट होऊन आपली राजकीय ताकद वाढवावी. देशाच्या विकासात विश्वकर्मा समाजाची मौलाची भूमिका राहिलेली आहे, असंही खासदार जांगडा यावेळी म्हणाले.