रामबन जिल्ह्य़ात सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात ठार झालेल्यांच्या निषेधार्थ बनिहाल पट्टय़ात निदर्शने करण्यात आली. दोन दिवसांनंतर अमरनाथ यात्रा सायंकाळी सुरू झाली.
रामबन जिल्ह्य़ातील संचारबंदी उठवण्यात आली असून कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. जम्मू येथून अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, घोषणाबाजी करीत निदर्शकांनी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. गोळीबाराला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना अटक करावी, अशी मागणी जमावाने केली. गुल भागात नव्याने निदर्शने करण्यात आली. दोन दिवसांनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात आला. बनिहाल पट्टय़ात जमावाने वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. जादा फौज तैनात करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. काश्मीर खोऱ्यात पहाटेच्या वेळी श्रीनगर, बडगाव, गंदरबल आणि बांदीपोरा जिल्ह्य़ात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.