करोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची. पण आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. एवढंच नव्हे तर, जन्म आणि मृत्यू बाबतचं रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

यामुळे देशात प्रत्येक जन्म आणि मृत्यूनंतर जनगणना आपोआप अपडेट होणार आहे. गृह मंत्रालयाने जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आसाममधील डिरेक्टोरेट सेन्सस ऑपरेशन्स इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. देशाचा विकास साधायचा असेल तर अद्ययावत जनगणना किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी अधिक भर दिला.

“पुढील जनगणना ही ई-जनगणना असेल. जी १०० टक्के परिपूर्ण जनगणना असेल. या जनगणनेच्या आधारावर, पुढील २५ वर्षांसाठी देशाच्या विकास कामांचं नियोजन केलं जाईल,” असंही ते म्हणाले. जनगणना ही विविध बाबींसाठी अत्यंत महत्त्वाची असते. आसामसारख्या राज्यात तर याचं महत्त्व अधिक वाढतं. आसाम हे राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे,” असंही ते पुढे म्हणाले.

संबंधित जनगणना प्रक्रियेला जन्म-मृत्यू रजिस्टरही लिंक केलं जाणार आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याचा तपशील जनगणना नोंदणीमध्ये आपोआप जोडला जाईल. संबंधित पाल्य १८ वर्षांचा झाल्यानंतर, त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट केलं जाईल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचं नाव यादीतून हटवलं जाईल. तसेच संबंधित व्यक्तीचं नाव आणि पत्ता बदलणं देखील अधिक सोपं होईल. याचा अर्थ आपली जनगणना आपोआप अपडेट होईल,” असंही अमित शाह यावेळी म्हणाले.