गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील पुवानरका गावात 'मां शाकुंभरी विद्यापीठा'ची पायाभरणी केली. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते. यावेळी त्यांनी पूर्वी दिल्लीहून सहारनपूरला जायला आठ तास लागत होते, आता फक्त तीन तास लागतात. चांगल्या रस्त्यांमुळे अंतर कमी झाले आहे. पंतप्रधान मोदींमुळे केवळ रस्त्याचे अंतरच कमी झाले नाही तर हृदयातील अंतरही कमी झाले आहे, असे म्हटले. यावेळी अमित शाह यांनी समाजवादी पक्ष, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांवर निशाणा साधला. अमित शाह यांनी स्थलांतराचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, अखिलेश यादव उत्तर प्रदेशच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ते कोणत्या चष्म्याने पाहतात हे मला माहित नाही. घरी जाऊन आकडे बघा. त्यांच्या राजवटीत राज्यात माफियांची राजवट होती. आज कायद्याचे राज्य आहे. गुन्ह्यांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. “गेल्या निवडणुकीत आम्ही स्थलांतर संपवण्याचे आश्वासन दिले होते. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ते आश्वासन तर पूर्ण केलेच पण विकासाला चालनाही दिली आहे. दिल्लीपासून रस्त्याचे अंतरच नाही तर मनातील अंतरही कमी झाले आहे,” असे अमित शाह म्हणाले. योगी सरकारपूर्वी उत्तप प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कमकुवत होती. आज महिलांना सुरक्षित वाटत आहे. “उत्तर प्रदेशमध्ये एक काळ होता जेव्हा माफिया मोठ्याने बोलायचे, आज तेच माफिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत आहेत. अरबो रुपयांच्या मालमत्तेवर अतिक्रमण करून माफिया बसले. योगी सरकारने सर्व कायदेशीर अडथळे पार करून ते मोकळे केले आहे,” असे अमित शाह यांनी म्हटले. "मी टीव्हीवर अखिलेश यादव यांचे भाषण ऐकत होतो. मला त्याला विचारायचे आहे की, तुम्ही कोणत्या चष्म्याने पाहता? मी तुमच्या पाच वर्षांची आणि योगीजींच्या पाच वर्षांची तुलना केली आहे. आता पश्चिम उत्तर प्रदेश असो की पूर्व उत्तर प्रदेश, भाजपeचे योगी सरकार आल्यानंतर एकही साखर कारखाना विकला गेला नाही, कुठेही बंद पडलेला नाही,” असे शाह म्हणाले. “शस्त्रांचा वापर करून लुटीच्या घटनांमध्ये ६९ टक्क्यांनी घट झाली आहे. हत्या ३० टक्क्यांनी कमी झाल्या. हुंड्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २२.५ टक्क्यांनी घट झाली आहे. अखिलेश जी घरी जा आणि माहिती तपासा. तुमच्या राजवटीत उत्तर प्रदेशात माफियांचे राज्या होते. पण आज उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे,” असे अमित शाह यांनी म्हटले. यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, हस्तकला आणि औद्योगिक उपक्रमांसाठी ओळखला जाणारा सहारनपूर जिल्हा अनेक दशकांपासून स्वत:चे विद्यापीठ असावे अशी मागणी करत होता. मागील सरकारकडे विकासाचा अजेंडा नव्हता. जिथे जातिवाद, घराणेशाही आणि परिवारवाद असेल तिथे विकासाला वाव राहणार नाही असे म्हटले. तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, आज उत्तर प्रदेशात विद्यापीठे सुरू होत आहेत, महाविद्यालये सुरू होत आहेत, चांगले रस्ते बांधले जात आहेत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत, गरीबांची घरे बांधली जात आहेत, शांततेसाठी कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले आहे. हे सुशासन आहे, असे म्हटले.