पीटीआय, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले, की स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त साजरा केला जाणाऱ्या ‘अमृत महोत्सवा’स एका व्यापक लोकचळवळीचे रूप येत आहे, समाजाच्या सर्व स्तरांतील आणि वर्गातील नागरिक त्यात सामील झाले आहेत. तिरंगा ध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांची २ ऑगस्ट ही जयंती आहे, त्यामुळे २ ते १५ ऑगस्टदरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या विविध समाजमाध्यम खात्यावर तिरंग्याचे छायाचित्र ‘प्रोफाइल पिक्चर’ म्हणून ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. मोदींच्या आकाशवाणीवरील मासिक संवादसत्र ‘मन की बात’च्या ९१ व्या भागात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उल्लेख केला आणि १३ पासून १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकावून या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मोदींनी सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या योद्धय़ांना अभिवादन केले आणि ‘अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत देशभरात आयोजित विविध कार्यक्रमांचा उल्लेख केला. ते म्हणाले, की या अमृत महोत्सवाला व्यापक लोकचळवळीचे रूप येत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि प्रत्येक घटकातील नागरिक संबंधित विविध कार्यक्रमांत सहभागी होत आहेत. मेघालयात स्वातंत्र्यसैनिक यू. टिरोत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, कर्नाटकातील अमृता भारती यांच्या नावाने सुरू झालेली मोहीम, तसेच स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी संबंधित रेल्वे स्थानकांवर आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा उल्लेख केला. तो म्हणाले, की अशा कार्यक्रमांची मोठी यादी आहे. अशा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात देशवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. आपण सर्व देशवासीयांनी आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पाळले पाहिजे, हा या सर्व कार्यक्रमांमागील सर्वात मोठा संदेश आहे. तरच आपण असंख्य स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करू शकू, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांतील भारत निर्माण करू शकू. ‘करोना निर्मूलनासाठी भारतीय औषधांचे योगदान!’ करोना महासाथीसंदर्भात मोदींनी सांगितले, की त्याविरुद्ध देशवासीयांचा लढा अजूनही सुरू आहे आणि संपूर्ण जग अजूनही त्याच्याशी लढत आहे. मोदींनी करोना विषाणूविरुद्धच्या उपाययोजनांत भारतीय पारंपरिक औषधांच्या योगदानाबद्दल सविस्तरपणे सांगितले आणि सांगितले, की, ‘आयुष’ने जागतिक स्तरावर यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभरात आयुर्वेद आणि भारतीय उपचारपद्धतींतील औषधांबद्दलचे आकर्षण वाढत आहे आणि त्यामुळेच ‘आयुष’च्या निर्यातीत विक्रमी वाढ झाली आहे आणि या क्षेत्रात अनेक नवीन उद्यमीही (स्टार्टअप) उदयास येत आहेत. करोना काळात औषधी वनस्पतींवरील संशोधनातही मोठी वाढ झाली आहे. या संदर्भात अनेक शोधनिबंध प्रसिद्ध होत आहेत. ही नक्कीच चांगली सुरुवात आहे. खेळण्यांच्या आयातीतील कपातीचा संदर्भ देत मोदींनी सांगितले, की परदेशी खेळण्यांच्या आयातीत ७० टक्क्यांनी घट झाली आहे. या उलट भारतातून खेळण्यांची निर्यात ३०० ते ४०० कोटींवरून दोन हजार ६०० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.