अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानची गुलामी स्वीकारण्यास नकार दिला. काबूल ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तान सोडण्याऐवजी त्यांनी तालिबान्यांना पंजशीर खोऱ्यातून आव्हान दिले. ते काही काळ ट्विटवर सक्रिय होत पण नंतर गायब झाले. आता पुन्हा एकदा सालेह यांनी ४९ दिवसांनंतर ट्विटरवर परतत विरोधकांना आव्हान दिले आहे. अफगाणिस्तानच्या ताब्यातील अडीच महिन्यांचा डेटा शेअर करत त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचा आरोप सालेह यांनी केला आहे.

अमरुल्ला सालेह यांनी ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अडीच महिन्यांचा निकाल असे म्हणत आकडेवारी दिली आहे. जीडीपीमध्ये ३० टक्के घट (अंदाजे), दारिद्र्य पातळी ९० टक्के, शरियतच्या नावाखाली महिलांची घरगुती गुलामगिरी, प्रेस/मीडिया/अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर रोख, शहरी मध्यम वर्ग निघून गेला, बँका रिकाम्या आहेत अशी असा अहवालच सालेह यांनी दिला आहे.

“अफगाणिस्तान राजकीय महत्त्व असलेले ठिकाण दोहा येथे हलवण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या परदेशी आणि सुरक्षेशी संबंधित निर्णय आता रावळपिंडीमधून घेतले जात आहेत. तालिबानपेक्षा शक्तिशाली एनजीओ आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि हक्कानी ग्रुप दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात गुंतले आहेत,” असे अमरुल्ला सालेह यांनी म्हटले आहे.

“अमरुल्ला सालेह यांनी ट्विट करत पाकिस्तानला फटकारले आहे. अफगाणिस्तान खूप मोठा आहे जो पाकिस्तान गिळू शकत नाही. ही काळाची बाब आहे. आम्ही सर्व बाबतीत विरोध करू जेणेकरून आम्ही पाकिस्तानी अधिपत्यापासून आमच्या सन्मानाचे रक्षण करू शकू. ही काळाची बाब आहे पण आपण अफगाणिस्तानचा उदय नक्कीच पाहू,” असे सालेह यांनी म्हटले आहे.