पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी मंगळवारी अभिनेते अनुपम खेर यांना फोन करून त्यांना व्हिसा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, अनुपम खेर यांनी आपण इतर कार्यक्रमांची निमंत्रणे स्वीकारली असल्याचे सांगत व्हिसा घेण्यास नकार दिला.
कराचीत शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या साहित्य महोत्सवासाठी बॉलिवूड अभिनेते व भाजप समर्थक अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला होता. स्वतः अनुपम खेर यांनीच याबद्दल माध्यमांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच अब्दुल बसीत यांनी अनुपम खेर यांना फोन करून त्यांना व्हिसा देण्याची तयारी दर्शविली.
अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला
कराचीतील चार दिवसांच्या साहित्य महोत्सवासाठी आयोजकांनी १८ भारतीयांना निमंत्रित केले होते त्यात अनुपम खेर यांचा समावेश होता पण खेर यांनाच व्हिसा नाकारण्यात आला आहे. ज्या इतर सतरा जणांना व्हिसा मिळाला, त्यात काँग्रेस नेते सलमान खुर्शीद व नंदिता दास यांचा समावेश आहे. अनुपम खेर यांना सरकारने अलिकडेच पद्मभूषण सन्मान दिला आहे. खेर यांनी सांगितले की या घटनेबाबत आपल्याला खेद वाटतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा व काश्मिरी पंडितांचा उपस्थित केलेला मुद्दा, देशभक्ती या कारणाने व्हिसा नाकारला असावा, अशी शंका वाटते. मला या निर्णयाचे वाईट वाटते. अनेकांना व्हिसा दिला पण मलाच दिला नाही. आम्ही त्यांच्या कलाकारांचे भारतात स्वागत करतो. माझ्या कलेचे भारतात स्वागत होत असेल, तर ती इतर ठिकाणीही स्वागतार्हच असली पाहिजे.